झांसी, उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील झांसीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवार रात्री झालेल्या आगीत NICU (नवजात शिशु कक्ष) मध्ये १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. प्रशासनाने तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू केले असून, तपासासाठी तीन स्तरांची चौकशी घोषित करण्यात आली आहे.
घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत अहवाल मागवला आहे. तसेच, मृतकांच्या कुटुंबांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला व PMNRF कडून मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
राजकीय दुर्लक्ष? निवडणूक महत्त्वाची की जनतेचा जीव?
अशा संकटात उत्तर प्रदेशातील भाजपचे नेते मात्र महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत गुंतलेले दिसतात. बालकांचा मृत्यू हा अत्यंत हृदयद्रावक प्रसंग असताना, राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. हा विरोधाभास जनतेला अस्वस्थ करणारा आहे. प्रश्न हा आहे की, निवडणूक प्रचार आणि सत्तेची लढाई हीच त्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे का? जनतेचे जीवन आणि सुरक्षेचा विचार कुठे आहे?
या दुर्दैवी घटनेने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपच्या नेतृत्वाने आता निवडणुकीपेक्षा नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.