नवी मुंबई: स्वराज्य पक्षाची आक्रमक भूमिका, जिल्हाध्यक्ष उमेश जूनघरे यांची मागणी
नवी मुंबईतील एका शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. या गंभीर प्रकरणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष उमेश जूनघरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकशी समिती नेमली. मात्र, अनेक आठवडे उलटूनही अहवाल प्रकाशात न आल्याने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न असल्याचा संशय बळावला आहे.
उमेश जूनघरे यांनी स्पष्टपणे सांगितले, “समिती गठित करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सत्य जनतेसमोर येऊ नये, यासाठीच अहवाल लपवला जातोय का, हा प्रश्न उपस्थित होतोय. जर संबंधित संस्थेची चूक नाही, तर अहवाल दडपण्याची गरजच काय?”
स्वराज्य पक्षाच्या मते, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षण संस्थांच्या उत्तरदायित्वाचा हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. समाजमन ढवळून टाकणाऱ्या या घटनेवर वेळेत कारवाई झाली नाही, तर भविष्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी तक्रार पक्षाने नोंदवली आहे.
“तत्काळ अहवाल सादर न झाल्यास, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा आवाज अधिक तीव्र करेल,” असा इशारा उमेश जूनघरे यांनी दिला आहे. तसेच, या प्रकरणात संबंधित सर्व अधिकारी आणि जबाबदार घटकांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे.
दरम्यान, स्थानिक पातळीवर नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड अस्वस्थता पसरली असून, अनेक सामाजिक संघटनांनी देखील या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष जनतेच्या हक्कासाठी लढा देत राहील, आणि सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही, असे स्पष्ट संकेत या माध्यमातून देण्यात आले आहेत.