निखिल सोमवंशी आत्महत्येने दिली काळजाला चटका लावणारी जाणीव

बेंगळुरू – ८ मे २०२५ रोजी ओला कंपनीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप ‘कृत्रिम’ मध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय मशीन लर्निंग अभियंता निखिल सोमवंशीने आत्महत्या केली. ही घटना केवळ एक व्यक्तीचा मृत्यू नसून भारतातील स्टार्टअप आणि कॉर्पोरेट जगतातील वाढत्या मानसिक त्रास आणि अन्यायकारक कामकाज संस्कृतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.



निखिल हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) चे सुवर्णपदक विजेते, तंत्रज्ञानातील उत्कृष्ठ संशोधक आणि देशाच्या उदयोन्मुख टेक इकोसिस्टममधील एक तेजस्वी प्रतिभा होते. मात्र, त्यांनी आत्महत्या केली तेव्हा त्यांच्यावर अत्यंत अमानुष दबाव होता, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.


काय घडलं होतं?


  • निखिल तीन लोकांची जबाबदारी एकट्याने पेलत होते, कारण त्यांचे सहकारी राजीनामा देऊन गेले होते.
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे आणि तणावामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते.
  • त्यांनी विश्रांतीसाठी रजा मागितली होती, परंतु व्यवस्थापनाकडून कोणतीही ठोस मदत किंवा समुपदेशन मिळाले नाही.



ही घटना अपवादात्मक नसून, ती एका खोल रुजलेल्या प्रणालीगत समस्येची लक्षणं आहे. आज स्टार्टअप, तंत्रज्ञान, कायदा, वैद्यकीय, पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्रातसुद्धा ही समस्या चिघळत चालली आहे.


मुंबई ग्रॅज्युएट्स असोसिएशन (MGA) यांचा ठाम संदेश: “बस्स झालं आता!”


MGA कडून निखिलच्या कुटुंबियांसोबत एकजूट दाखवली जात असून, आम्ही या दु:खद घटनेचा तीव्र निषेध करतो. MGA च्या वतीने खालील तात्काळ सुधारणांची मागणी केली जात आहे:


  • स्टार्टअप्स आणि कॉर्पोरेट्समध्ये वार्षिक मानसिक आरोग्य तपासणी अनिवार्य करावी.
  • कार्यस्थळी होणाऱ्या शोषणाची माहिती देणाऱ्यांसाठी व्हिसल ब्लोअर संरक्षण लागू करावं.
  • एकाच कर्मचाऱ्यावर तीन जणांचं ओझं टाकण्याची कामपद्धती त्वरित थांबवावी.
  • उच्च तणाव असलेल्या नोकऱ्यांमध्ये नवशिक्या कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य प्रशिक्षण देणं बंधनकारक करावं.
  • HR विभागाबाहेरील स्वतंत्र आणि सुरक्षित तक्रार निवारण यंत्रणा तयार कराव्यात.



MGA कडून भारत सरकारच्या कामगार मंत्रालयासह महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री, तसेच NASSCOM यांना पत्र पाठवून या विषयात तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


मानवी सन्मान आणि जीवनापेक्षा “हसल कल्चर” मोठं नाही.


काम हे भीतीशिवाय असावं – ही काही विशेषाधिकाराची गोष्ट नसून प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे.


आपण जर:


  • एक पदवीधर असाल आणि कार्यस्थळी मानसिक त्रास सहन करत असाल – कोणाला तरी सांगा, मदत घ्या.
  • एक स्टार्टअप फाउंडर असाल – आपले धोरण आणि अपेक्षा पुन्हा विचारात घ्या.
  • एक हायरिंग मॅनेजर असाल – फक्त परफॉर्मन्स नव्हे, तर माणसांची घडण देखील तुमचं उद्दिष्ट असायला हवं.



ही घटना केवळ नोंदवून विसरण्यासाठी नाही – ती बदल घडवण्यासाठी आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने