मोबाईल वापराच्या व्यसनामुळे अबालवृद्ध एका मानसिक गुंगीत आहेत.. मनाचा आणि बुद्धीचा एकंदरीत ताबा मोबाईल ने घेतलाय.. यामध्ये शिक्षणाच्या प्रवाहात असणाऱ्या लहानग्यांचंही प्रचंड नुकसान होतंय.. लहान मुलंही मोबाईलमुळे व्यसनाधीन झाली आहेत.. जन्माला आलेल्या बाळाच्याही भावनिक संवेदना या मोबाईल स्क्रिनशी जोडल्या जाव्यात...! मोबाईलचा हा अतिरेक किती खोलपर्यंत रुजला आहे..! याच्या एक से बढकर एक कहाण्या आपण ऐकतो आहोतच..! ह्युमन एंटरटेनिंगची जागा मोबाईल ने गॅझेट इंटरटेनिंग या स्वरूपात घेतलेली आहे.. मानवी संवेदना आणि एका अर्थाने त्यावरील भावनिक अवलंबित्व हे मोबाईलसापेक्ष होत चाललेलं आहे.. कोरोना कालखंडापासून वाढत गेलेल्या ' डिजिटल ' नामक गोंडस शब्दाचा विद्यमान कालखंडात भस्मासुर झाला असून त्याने एक एक करत सगळ्यांनाच आपल्या कव्हेत घ्यायला सुरुवात केलेली आहे..
वर्गातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गृहपाठ आणि अभ्यासाच्या खंडीत होणाऱ्या शृंखालेमुळे मी गेल्या काही दिवसांपासून चिंतेत आहे .. अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता अनेक विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढल्याचे निष्पन्न झाले.. अनेक विद्यार्थी पोटभर जेवत नाहीत.. अनेकजण उत्साहाने खेळत नाहीत... अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही.. रात्रभर झोप न झाल्यामुळे दिवसा फारसा उत्साह जाणवत नाही.. आणि हे चक्र असेच चालू राहते.. अनेक विद्यार्थ्यांची लक्षणे तर मेमरी लॉस सिंड्रोम या आजारासदृश्य जाणवतात.. विविध गेम्स आणि कार्टून्सने विद्यार्थ्यांचे बालविश्व उध्वस्त करून टाकलं आहे.. पालक बेबस, हताश आणि निराश आहेत.. आपल्यासमोर मोबाईल आपल्या मुलांना गिळंकृत करतोय हे माहिती असूनही ते काहीही करू शकत नाहीत.!
मोबाईलच्या अतिरेकामुळे शिक्षणापासून दुरावलेले विद्यार्थी हा कोरोनाउत्तर कालखंडात शिक्षण क्षेत्रावर झालेला सर्वात मोठा आघात आहे.. आणि चार वर्षे झाली तरी त्याची ' गूँज ' ऐकू येतच आहे.. मोबाईल आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या नकारात्मक मानसिकतेतून सुटका हे येणाऱ्या काही काळात मानवी जातीपुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे..
जन्माला येणारा प्रत्येक जण हा त्याच काळाचा अपत्य असतो या वाक्यानुसार यासाठी केवळ विद्यार्थ्यांना दोषी धरण अतिशय चुकीचं आहे हेही या ठिकाणी नमूद केलं पाहिजे .. परंतु , पालकांनी यासाठी ठोस पावलं उचलणं अत्यंत गरजेचे आहे .. मोबाईल सोडून अधिकाधिक संवादाचा मार्ग पत्करला पाहिजे.. आपण मोबाईल चाळला नाही तरी , आपल्यावर कुठलंही संकट येणार नाही हे आपण स्वतःच्या मनाला सतत बजावून सांगायला हवं.. do more thing to forget to check your phone.. " मम्मी पप्पा दोघेही सतत मोबाईल पाहतात.. त्यामुळे मग, मीही मोबाईल पाहतो किंवा पाहते " अशी उत्तर अनेक विद्यार्थी मला देतात तेव्हा कुटुंब व्यवस्था नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे ? असा प्रश्न मला पडतो.. शारीरिक , मानसिक आणि भावनिक या तिन्ही पातळ्यांवर विद्यार्थ्यांचं बालविश्व मोबाईलमुळे अक्षरशः चिरडलं जात आहे .. मोबाईलमुळे आपापल्या वयोगटाची बंधनं तोडून मुलं अधिकाधिक प्रगल्भ होत आहेत.. हे एका अर्थाने चांगलं असलं तरीही, आपल्या वयोगट सुलभ भावविश्वाप्रमाणे त्यांनी वर्तन करणं अपेक्षित असताना मुलं विनाकारण पोक्त होत असतील तर , ते मात्र निसर्ग नियमाला डावलून झाल्यासारखं होईल.. रसायन टाकून पिकवलेल्या फळांसारखी मुलांची अवस्था होऊ नये एवढीच प्रार्थना..
मोबाईलच्या अतिवापरामुळे मनुष्य एका आभासी जगात जगतोय.. जगात घडणाऱ्या आणि त्याच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक घटनेशी तो स्वतःला जोडू पाहतोय.. त्यामुळे त्याची प्रचंड भावनिक कोलाहल होतेय.. व्हिडिओ मागून व्हिडिओ आणि रिल्स मागून येणाऱ्या रिल्समुळे आयुष्यातील किती महत्त्वाचा कालावधी आपण गमावतो आहोत...! याचंही त्याला भान राहिलेलं नाही.. मोबाईलमुळे माणूस हुशार झाला. परंतु , शहाणा झाला का? हे पुन्हा एकदा तपासून पहावं लागेल.. मोबाईल या उपकरणाच्या निर्मितीमागील प्रयोजन आणि त्याचा प्रत्यक्षातील वापर याचा 36 चा आकडा आहे.. ज्या गोष्टीशी आपला दूरदूरपर्यंत संबंध नाही माणूस त्याची चिंता करतोय विचार करतोय , वेळ खर्च करतोय.. वैयक्तिक आयुष्याचा मासिक खर्च भागवता भागवता मेटाकुटीला येणारा माणूस हा , देश आणि जगाच्या अर्थव्यवस्थेची काळजी वाहतोय.. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीने भारतावर काय परिणाम होणार? याचा विचार करतोय ? विविध जातीय, धार्मिक आणि प्रांतिक अस्मितांना बळी पडून इतरांची भावनिक शिकार होतोय.. इतरांच्या आयुष्यात काय चाललं आहे..? याची त्याला उत्सुकता निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच नकळत का असेना त्याचंही खाजगी आयुष्यही चव्हाट्यावर येतंय..
आपल्याला गिर्हाईक किंवा एक अर्थाने बकरा बनवण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीचे दलाल डोळा ठेवून आहेत.. आपली प्रायव्हसी इतरांना विकली जातेय हे माहिती असूनही आपण यात काहीही करू शकत नाहीत.. मोबाईलमुळे माणसाने स्वतःच्या आतच एक विश्व तयार केलेलं असून त्यातील बदलाचा वेगही महाभयंकर आहे.. परंतु , वास्तविक जगात आणि त्याच्या अवतीभोवती काय चाललं आहे .! या जाणिवेपासून मात्र तो परावृत्त होत चालला आहे..
तुम्हारे बज्म के बाहर भी एक दुनिया है.. मेरे हुजूर..! बडा जुर्म है ये बेखबरी....
अशी आठवण त्याला करून देण्याची वेळ आलेली आहे..
पूर्वी माणसं झोपली की शरिराला आराम मिळायचा आता माणसं झोपली की , मोबाईलला आराम मिळतो हे नव्या युगातील डिजिटल जगाचं बदलत चाललेलं चित्र आहे.. मोबाईल आणि त्याचे दुष्परिणाम हे लोकांना माहिती नाहीत असं बिलकुल नाही.! . मुळात , व्यसन करणाऱ्या प्रत्येकाला त्याचे दुष्परिणाम माहिती असतातच..! परंतु , व्यसनाच्या बाबतीत मन हे बुद्धीवर भारी पडतं..
बुद्धी का जाना तो क्या जाना ?
मन का जाना तो सब जाना...
या वाक्याप्रमाणे मानवी अवचेतन मनात बदल केल्याखेरीज माणसाच्या आयुष्यात बदल होत नाहीत.. मोबाईलच्या व्यसनापासून सुटका यालाही दुसरा कुठला पर्याय नाही.. मोबाईलवरील आपलं सर्वकालिक अवलंबित्व कमीतकमी करणं हा एकच मार्ग मला तरी दिसतो...
लेखक - संतोष कुलकर्णी (पंढरपूर) 91300 76136