पत्रकारितेचा प्रवास: मंत्रालयातील विभागांचा सखोल अभ्यास

मुंबई, २३ जानेवारी २०२५: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर नाशिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी आज महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या विविध विभागांना भेट देऊन त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती मिळवण्याची विशेष योजना राबवण्यात आली. या उपक्रमात मंत्रालयातील ‘न्यूज फोल्ड,’ ‘जाहिरात,’ ‘सन्मान निधी,’ आणि ‘नवमाध्यम’ (सोशल मीडियासाठी नवीन विभाग) यांसारख्या विभागांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला.



विविध विभागांची माहिती आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन


या भेटीदरम्यान विद्यार्थी मंत्रालयातील विविध जनसंपर्क अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटले आणि त्यांच्या कामकाजाची पद्धत समजून घेतली.

माहिती व प्रसारण विभागाचे संचालक दयानंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पत्रकारितेच्या आव्हानात्मक आणि सतत बदलणाऱ्या स्वरूपावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले, “पत्रकारितेमध्ये प्रामाणिक व वस्तुनिष्ठ बातम्या तयार करण्यावर भर दिला पाहिजे. विषयाचा सखोल अभ्यास करून संशोधन केलेले लेखन प्रकाशित करणे गरजेचे आहे. आम्ही माहितीची सत्यता तपासतो आणि नंतर ती मुख्यमंत्री व वरिष्ठांना पोहोचवतो.”


इतिहास, बदल आणि पत्रकारितेचा दृष्टिकोन


माहिती व प्रसारण विभागाचे संचालक हेमराज बागुल यांनी पत्रकारितेच्या ऐतिहासिक प्रवासाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की,

1. स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक पत्रकारिता होती.

2. १९४० ते १९५५ दरम्यान राजकीय पत्रकारितेला प्राधान्य होते.

3. त्यानंतरच्या काळात विकास पत्रकारितेने महत्त्व मिळवले.


बागुल यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर चर्चा करताना सांगितले की, एकेकाळी लोक वाचक पत्रकारितेला संपादकांच्या नावांमुळे ओळखत होते, जसे खाडिलकर यांचे ‘नवाकाळ.’ आज मात्र वाचक बातम्यांना त्यांच्या गटांच्या नावाने ओळखतात.


त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) भविष्यातील भूमिकेवर भाष्य करताना सांगितले, “AI स्टँडर्डायझेशन आणेल, पण विचारांची मौलिकता आणि लेखनातील वैविध्य कायमच महत्त्वाचे असेल. AIमुळे साचेबद्ध व नक्कल लेखन वाढेल, त्यामुळे सर्जनशील व स्वतंत्र विचारांच्या लेखकांना अधिक मागणी असेल.”


कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन


कार्यक्रमाच्या समारोपाला पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या संचालिका कृतिका देशपांडे-मराठे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने कांबळे सर, बागुल सर, तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मदत करणाऱ्या कोल्हे मॅडम यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनीही या अभ्यासदौऱ्यामुळे आपले ज्ञान समृद्ध झाल्याची भावना व्यक्त केली.


या उपक्रमाने विद्यार्थ्यांना मंत्रालयाच्या कामकाजाची समज मिळवून देत त्यांना पत्रकारितेच्या तांत्रिक व प्रायोगिक बाजूंचे महत्व समजावले. शेवटी, सर्वांनी हा अभ्यासक्रम आणखी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार संघाने सतत प्रयत्नशील राहावे, अशी प्रार्थना केली.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने