छत्रपती शिवाजी महाराज – या नावातच एक अनोखा गंध आहे, एक प्रेरणा आहे, शक्ती आहे. महाराष्ट्राच्या मातीतला वीर योद्धा आज ३५० वर्षांनंतरही प्रत्येकाच्या हृदयात अढळ स्थान राखून आहे. त्यांच्या महान अभूतपूर्व जीवनकार्याचा मागोवा घेताना इतिहास आपोआप गर्जना करतो – “हर हर महादेव!”
शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी (शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीया) शिवनेरी गडावर झाला. जन्मतिथी आणि तारीख बाबत मतभेद असले तरी ही तारीख प्रामुख्याने मान्य केली जाते. जन्मवेळ सकाळी ६.४९ वाजता होती, आणि कुंडलीत सिंह लग्न, मेष राशी, चंद्र-मंगळाची अनुकूल स्थिती, सूर्य बलवान होता. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्वही सिंहासारखे धैर्यवान आणि तेजस्वी होते.
त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाही दरबारातील सेनानी होते. शहाजीराजेंना रणभूमीचे उत्तम ज्ञान होते. त्यांच्याकडूनच शिवबांना शौर्याचे बाळकडू मिळाले.
त्यांची आई जिजाबाई (राजमाता जिजाऊ) या धर्मपरायण, न्यायप्रिय आणि स्वाभिमानी होत्या. त्यांनी शिवबांच्या मनात लहानपणापासून रामायण-महाभारताचे संस्कार रुजवले.
शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे निजामशाहीचे प्रतिष्ठित सरदार होते. वंशपरंपरेनेच शिवबांमध्ये पराक्रमाचे रक्त वाहत होते.
शिवराय लहानपणापासूनच चपळ, धाडसी आणि बुध्दिमान होते. त्यांच्या डोळ्यांत सदा स्वराज्याचे स्वप्न दिसायचे. वयाच्या सातव्या वर्षीच त्यांनी तलवार चालवणे, घोडेस्वारी, धनुर्विद्या शिकण्यास सुरुवात केली. मावळ्यांमध्ये खेळताना शिवबा केवळ राजघराण्यातील मुलगा नव्हता, तर त्यांच्यातलाच एक सखा होता. जिजाऊंनी त्यांना सांगितलेल्या श्रीराम, अर्जुन, छत्रपती युवराज यासारख्या कथा ऐकतच शिवबांचे बालपण गेले. त्यातूनच त्यांच्या मनात अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा निर्माण झाली. लहानपणीची त्यांची प्रत्येक हालचाल ही भविष्यातील हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी पायाभरणी ठरत होती. जसा लहानगा शिवबा वयाने वाढत गेला, तसतसे त्याचे चातुर्य, धैर्य, आणि लोकसंग्रह वाढत गेला. त्यांचे फक्त नाव ऐकून शत्रू दचकत असत.
शिवरायांनी कधीच जात-पात, धर्मभेद मानला नाही. त्यांच्या सैन्यात मराठे, धनगर, कोळी, माळी, मुसलमान, मांग, महार, आदिवासी, रामोशी सर्वजातीतील मावळे होते. मावळे हे शिवरायांचे खरे बंधू होते. “कुळवाडी भूषण” असलेले शिवराय साऱ्यांना एकसमान वागवत. त्यांच्या गडांवरील किल्लेदार, शिपाई, तोफखान्यातील अधिकारी हिंदू-मुस्लिम सर्वच होते. सिद्धी हिलाल, दौलतखान, आणि इब्राहीमखान यांसारखे मुसलमान सरदार शिवरायांच्या सेनेत मोठ्या पदांवर होते.
त्यांनी कधीही मशिदी पाडल्या नाहीत. जेव्हा त्यांनी जावळीच्या चंद्रराव मोर्यांवर विजय मिळवला, तेव्हा शरण आलेल्या सर्वांनाच क्षमा केली. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली.
त्यामुळेच शिवरायांचा न्यायनिवाडा ऐकून “शिवबा न्याय करतोय” म्हणून लोक आनंदून जायचे. शिवराय हे फक्त तलवारीच्या जोरावर नव्हे, तर त्यांच्या द्रष्ट्या बुद्धीमुळे, कणखर नेतृत्वामुळे आणि प्रजेवरच्या अपार प्रेमामुळे छत्रपती झाले.
महाराजांचे काही गुणविशेष:
• शौर्य व धैर्य: अफजलखानासारख्या प्रचंड बलाढ्य सरदाराला मरण यातना देणारा शिवबा रणभूमीचा राजा होता.
• राजकारण: आग्र्याच्या कैदेतून सुटका हा त्यांचा राजनैतिक डावपेचाचा उत्कृष्ट नमुना होता.
• प्रजाहितदक्ष: “राज्य आहे ते प्रजेकरिता” हे त्यांचे धोरण होते.
• स्त्रियांचा सन्मान: शत्रूच्या स्त्रियांना देखील “माता-भगिनी” म्हणून सन्मान देणारा राजा म्हणजे शिवबा!
शिवरायांचे विचार आजही प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शक आहेत.
त्यांचा “शिवस्पर्श” जिथे होतो, तिथे गुलामी नष्ट होते, अन्याय संपतो आणि माणूस स्वाभिमानाने जगायला शिकतो. जेव्हा अन्याय सहन करणाऱ्यांचा आवाज थंडावतो, तेव्हा शिवराय पुन्हा जन्माला येतात. शिवरायांचे जीवन म्हणजे “शौर्य, स्वाभिमान आणि न्याय” यांचा मिलाफ आहे.
हर हर महादेव!
जय भवानी!
जय शिवाजी!
हे नुसते शब्द नाहीत, तर आत्म्यात स्फूर्ती देणारी मंत्रसत्ताच आहे.
शिवराय म्हणजे प्रेरणा, शिवराय म्हणजे संघर्ष, शिवराय म्हणजे स्वाभिमान!